Saturday, March 8, 2008

"मनसे'च्या वर्धापनदिनाला कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या दुसरा वर्धापनदिन आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घातलेल्या बंदीमुळे जाहीर सभा होणार नसली तरी त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना "कृष्णकुंज' या निवासस्थानी बोलावले आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने उद्या शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. ....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या जाहीर कार्यक्रमास महानगरपालिकेने परवानगी नाकारल्यामुळे पक्षाला कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. सार्वजनिक हित व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता पोलिसांनी परवानगी न दिल्याने शिवाजी पार्कवर साजरा होणाऱ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही, असे पत्र महापालिकेच्या जी - उत्तर कार्यालयाकडून देण्यात आले आहे. याचा "मनसे'च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

"मनसे'ने उत्तर भारतीयांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषण, रॅली आणि पत्रकार परिषदांवर पोलिसांनी बंदी घातली होती. ही बंदी वाढविण्यात आल्यावर त्याची मुदत संपताच राज ठाकरे यांच्यावर "कारणे दाखवा' नोटीस बजाविण्यात आली. पक्षातर्फे या नोटिशीला उत्तर देण्यात आले असले तरी पोलिसांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने उद्या ९ मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सहमती दिली नाही. त्यामुळे महानगरपालिकेनेही शिवाजी पार्क मैदानावर मागितलेल्या परवानगीला नकार कळविला आहे.

महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या हितासाठी बोलणे हा या मराठी राज्यात गुन्हा ठरू लागला आहे. भाषण बंदी घालून समाधान न झाल्यामुळे आता "मनसे'चा वर्धापनदिन साजरा होऊ नये यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न चालविले आहेत, त्याबद्दल पक्षातर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या नोटिशीला आलेले उत्तर असमाधानकारक आणि अस्पष्ट असल्याने त्यांना सोमवारपर्यंत आणखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरील बंदीबाबतचा निर्णय सोमवारी होईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.

1 comment:

Unknown said...

Dear Rajji,
Pl. declare that we would like to start businesses in Bihar, UP, TN particularly for Marathi people of those states run by Marathis only. You will find resistance from them - Govt level, citizen level.. and then make bombabomb of such resistance that other states are not allowing Indians to earn their rojiroti.